Alcoholics Anonymous (Marathi)


प्रस्तावना


अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी, ही पुरुष व स्त्रियांची एक संघटना आहे. ह्यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात कि ज्यामुळे सर्व सभासंदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा स्फुरते. अशा तर्रेने सभासद आपले स्वतःचे तसेच एकदुसार्याचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दूर राहतात.
या संघटनेत सामील होण्यास फक्त एकाच अट आहे कि दारूच्या रोगातून मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहिजे. ए.ए. च्या सभासदत्वासाठी कसलीही वर्गणी किंवा देणगी आकारली जात नाही. सभासंदांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांवर आम्ही स्वावलंबी आहोत. संघटना कुठलाही धर्म किंवा सामाजिक अथवा राजकीय तत्वांचा प्रचार करत नाही. इतर कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय पक्षांशी ह्या संघटनेचा संबंध नाही.
संघटनेचे ध्येय एकच आहे की,"मद्यापासून स्वताला दूर ठेवणे आणि इतर मद्यपीडीत लोकांना ज्यांना दारूपासून मुक्ती मिळवण्याची इच्छा आहे त्यांना मदत करणे."


आपण स्वतः मद्यपी आहात   का ?
प्रश्न 
१) दारू पिण्यामुळे तुमचा कामाचा वेळ कमी होत चालला आहे का ?(होय/नाही)
२)दारू पिण्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन दुःखी बनत  चालले आहे का ?(होय/नाही)
३)इतर लोकात मिसळू शकत नाही म्हणून तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)
४)दारू पिण्याचा दुष्परिणाम तुमच्या सामाजिक स्थानावर होत आहे का ?(होय/नाही)
५)दारू प्याल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होतो आहे का ?(होय/नाही)
६)दारू पिण्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीत कधी आला आहात का ?(होय/नाही)
७)दारू पिताना तुम्ही कमी दर्जाच्या लोकांची सांगत करता का ?(होय/नाही)
८)दारू पिण्यामुळे कौटुंबिक जबाबदार्यांकडे तुमचे दुर्लक्ष होते आहे का ?(होय/नाही)
९)दारू प्यायला सुरवात केल्यापासून तुमच्या महत्वाकांक्षा कमी झाल्या आहेत का ?(होय/नाही)
10)रोज नेहमी एखाद्या ठराविक वेळी दारू पिण्याची तुम्हाला तीव्र  इच्छा होते का ?(होय/नाही)
11)दुसर्या दिवशी सकाळी तुम्हाला दारूची गरज भासते का ?(होय/नाही)
१२)दारू पिल्याशिवाय झोप लागणे तुम्हाला कठीण जाते का ?(होय/नाही)
१३)दारू प्यायला लागल्यापासून तुमची कार्यक्षमता कमी झाली आहे का ?(होय/नाही)
१४)दारू पिण्यामुळे तुमच्या नोकरी धन्द्द्यावर धंद्यावर काही अनिष्ट परिणाम झाला आहे का ?(होय/नाही)
१५)चिंता आणि त्रास यापासून सुटका होण्यासाठी तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)
१६)तुम्ही एकट्यानेच दारू पिता का ? (होय/नाही)
१७)दारू पिण्यामुळे तुमची स्मरणशक्ती कधी कधी पूर्णपणे नाहीशी झाली आहे का ?(होय/नाही)
१८)दारूच्या दुष्परिनामावर तुम्हाला वैद्यकीय औषधोपचार करून घ्यावे लागले आहेत का ?
१९)तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)
२०)दारू पिण्यामुळे इस्पितळात किंवा मानसोपचार केंद्रात उपचार करून घेण्याची पाळी तुमच्यावर कधी आली आहे का ?(होय/नाही)
वरील पैकी एका प्रश्नाचे उत्तर होय असेल तर आपण दारुडे होण्याची दाट श्यक्यता आहे.
दोन प्रश्नांचीउत्तरे होकारार्थी असल्यास आपण दारुडे असण्याची शक्यता आहे
तीन किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे असल्यास आपण निश्चित दारुडे आहात.

दारु तुमची किंवा तुमच्या कूटुंबाची समस्या आहे काय?
 असल्यास...............
 
नाशिक मध्ये विनामुल्य मदती साठी संपर्क साधा.
 
ए.ए.नवजीवन समूह. हुतात्मा स्मारक ,सीबीएस जवळ, नासिक-422 002. वार सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार  संध्याकाळी7:30 तेे 9
प्रगती समूह, रोकडोबा हनुमान मंदिर गोदावरी घाट नाशिक.
गुरुवार व रविवार संध्याकाळी7:30 तेे 9
संपर्क: GOPAL S.9822337389, सतीश जी.9923109491 मिटीग चा वार आणि वेळ ------ सोमवार,बुधवार,शनिवार - संध्याकाळी 7:30

 
संपूर्ण महाराष्ट्रा साठी संपर्क: 02265255134

प्रार्थना

देवा,ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही,
ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे.
जी परिस्थिती मी बदलू शकतो,
ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे.
 आणी अशा परिस्थितीतला भेद,
जाणण्याचे ज्ञान मला दे.

अल्कोहॉलिक्स अनॉनिमस
तुमच्या माहितीतील एखादी चांगली व्यक्ती दारूच्या व्यसनापायी स्वत:च्या व आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या आयुष्याची राखरांगोळी करते आहे का ? तर अशा दारूच्या संपूर्ण आहारी गेलेल्या व्यक्तीला तुम्ही कुठलाही खर्च न करता , दारूपासून दूर राहण्यास मदत करू शकता का ? होय , हे आता शक्य आहे केवळ अनामिक मद्यपी (एए)च्या वाढत जाणाऱ्या बंधुत्वामुळे. अल्कोहॉलिक्स अनॉनिमस अर्थात अनामिक मद्यपी ( एए). या संस्थेची स्थापना होऊन आज बरोबर 68 वर्षं पूर्ण होत आहे. बरोबर याच दिवशी ( 10 जून रोजी) 1935 साली एक डॉक्टर , जो मद्यपाशाच्या विळख्यात संपूर्ण अडकला होता. पण त्याच्यात झालेल्या आध्यात्मिक परिवर्तनामुळे त्याला त्याच्या उर्वरित आयुष्यात एकदाही दारू पिण्याची गरज भासली नाही. हा चमत्कार कसा घडून आला ? त्याच्यावर कुणी संमोहन करून त्याचं दारू पिण्याचं आकर्षण कमी केलं होतं का ? नाही. कुणीही त्याच्यावर जादूटोणा , करणी , वशीकरण , मायाजाल किंवा गंडा , दोरा , धागा इत्यादीचे प्रयोग करून त्याचं दारू पिण्याचं भूत उतरवलं नव्हतं. गोळ्या , कॅप्सुल , इंजेक्शन , किंवा सलाइनसारख्या धोकादायक रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने त्याची दारू सोडवली नव्हती. मग असं काय घडलं की डॉ. बॉबसारख्या अट्टल बेवड्याची दारू एकाएकी सुटली. त्याची भेट एका मद्यातून मुक्त झालेल्या बिल डब्ल्यूशी झाली होती. बिलने आपले मद्यपानाच्या काळातील अनुभव सांगून , या नवीन ओळख झालेल्या मित्राचा विश्वास काही मिनिटातच संपादन केला होता. बिलने त्याला आपली ओळख सुधारणेच्या मार्गावरील एक वाटसरू म्हणून करून दिली होती. तो स्वत: जवळजवळ सहा महिन्यांहून अधिक काळ दारूच्या त्या पहिल्या घातकी घोटापासून दूर राहिला होता. आध्यात्मिक अनुभवामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये घडणाऱ्या मानसिक व भावनिक स्थित्यंतराचा अलौकिक अनुभव बिलला घडला होता. त्याला सृष्टीच्या चालकाच्या अस्तित्वाचा साक्षात्कार म्हणा किंवा आत्मसाक्षात्कार म्हणा किंवा बिलच्याच भाषेत सांगायचं झालं तर प्रकाशानुभव म्हणा हा घडला होता. या अनुभवानंतर त्याने मरेपर्यंत कधीही दारूला स्पर्शही केला नव्हता. एका वेगळ््या आध्यात्मिक पातळीवरचं जीवन तो आचरण करत होता. त्याला त्याच्या फॅमिली डॉक्टरने आपल्या स्वत:च्या प्रॅक्टिसमधून समजलेल्या व शोधून काढलेल्या मद्यपाश रोगाची शारीरिक , मानसिक , भावनिक लक्षणं स्पष्टपणे सांगितली होती. डॉ. विलियम जेम्सच्या ' व्हरायटीज ऑफ रिलिजस एक्सपिरिएन्स ' या ग्रंथाचं अनेक वेळा वाचन केल्यानंतर त्याला जो आध्यात्मिक प्रकाशानुभव आला त्याने त्याच्यात परिवर्तन झालं होतं. त्याला साक्ष डॉ. सिल्कवर्थ यांची होती. असा हा आत्मसाक्षात्कारी बेवडा , आपण पुन्हा दारू पिऊ नये अशी सबब सांगून नोव्हेंबर 1934 पासून अमेरिकेतील पन्नासहून अधिक दारुड्यांची समजूत घालून , त्यांना मद्यमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील होता. परंतु दुदैर्वाने डॉ. बॉबशी भेट होण्यापूवीर् त्याला एकाही दारुड्याला सुधारण्यात यश आलं नव्हतं. परंतु निराश न होता , आपण स्वत: दारूपासून दूर राहण्यात यशस्वी झालो आहोत या सकारात्मक विचाराने बेवड्यांना संदशे देण्याचं तंत्र विकसित करत राहिला.
10
जून 1935 च्या घटनेनंतर या दोघांनी संपूर्ण अमेरिकन राष्ट्राला भेडसावणाऱ्या या मारक समस्येवर अचूक उपाय योजना शोधून काढली. त्यांच्या एकत्रित केलेल्या प्रयत्नामुळे बघता-बघता शंभराहून अधिक माणसं दारूच्या विळख्यातून मुक्त झाली. ' इवलेसे रोप लावियिले द्वारी , तयाचा वेलू गेला गगनावरी ', या अनुभवाचा पुर्न:प्रत्यय यावा त्याप्रमाणे अनामिक मद्यपीचा हा मोगरा गेल्या अडुसष्ट वर्षात 150 हून अधिक देशामध्ये 21 लाखाहून अधिक बेवड्यांच्या जीवनात फुलला आहे. कोट्यावधी जनता या लाखो दारुड्यांमुळे नरकयातना भोगत होती , ती आजच्या या सोनियाच्या दिवशी देवाचे शतश: आभार व्यक्त करत आहेत. जर तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्ती दारूच्या आजाराला बळी पडली असेल तर तुम्ही त्याची एएशी गाठभेट घालून देऊन त्याच्या कुटुंबात आनंद आणू शकता. गरज आहे ती फक्त एका फोन कॉलची.


फक्त आजच्या दिवसासाठी
       फक्त आजच्या दिवसासाठी मी आयुष्यभराचे सर्व प्रश्न,चिंता,एकदम सोडविण्या ऐवजी फक्त आलेला हा दिवस व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न करणार आहे. शांत आयुष्य जर मला जगायचे असेल तर मी आजचा दिवस काहीतरी करू शकतो.           फक्त आजचा  दिवस मी आनंदी राहीन,अनुभवी लोकांनी अचूक सांगितले आहे की जेवढा निश्चय करतील तेवढाच आनंद सर्वजण उपभोगू शकतील. फक्त आजचा  दिवस सर्व परिस्थिती माझ्या  इच्छा  आकांक्षा प्रमाणेच बदलण्या ऐवजी मी स्वतःला त्यापरीस्थितीनुरूप बदलण्याचा प्रयत्न करीन.
       फक्त आजचा  दिवस मी माझ्या मानसिक शक्तीत वाढ करण्याचा प्रयत्न करीन.स्वतःला उपयुक्त अशी एखादी गोष्ट मी अभ्यासण्याचा व शिकण्याचा प्रयत्न करीन.माझ्या चंचल मनाला मी आजचा दिवस आवर घालीन.ज्यासाठी मनाची एकाग्रता, विचारला पूरक व प्रयत्न लागतील असे काहीतरी वाचण्याचा मी प्रयत्न करीन.
            फक्त आजचा  दिवस मी माझ्या मनाला तीन प्रकारची शिकवण देईन.समजणार नाही अशा रीतीने मी आज कोणाचे तरी भले करीन आणि तरीही कुणाला समजले तरी मी त्याची दखल घेणार नाही . फक्त मानसिक व्यायाम म्हणून ज्या गोष्टी मला कराव्याश्या वाटणार नाहीत अशा दोन तरी गोष्टी करीन जरी माझ्या भावना दुखावल्या गेलेल्या असल्या तरी तसे दाखविणार नाही. निदान आज तरी तसे दर्शविणार  नाही.
            फक्त आजचा  दिवस मी दुस-याचे ऐकेन. जास्तीत जास्त  व्यवस्थीत दिसण्याचा,नीटनेटके कपडे करण्याचा,नम्रतेने वागण्याचा, किंचितही टीका न करण्याचा, दुसर्याच्या चुका न शोधण्याचा व माझ्याशिवाय अन्य कोणालाही न सुधारण्याचा प्रयत्न करीन.
       फक्त आजच्या दिवसासाठी मी एक दिनक्रम आखेन. तंतोतंत पाळला गेला नाही तरीही मी दिनक्रम आखेन.दोन घातक गोष्टींपासून माझा बचाव करीन.---- घाईगडबड व अनिर्णायाकता.
            फक्त आजचा  दिवस मी फक्त माझ्यासाठी शांतपणे अर्धा तास घालवीन व विश्रांती घेईन. काही वेळेस ह्या अर्ध्या तासात मी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न करीन.
       फक्त आजचा  दिवस मी  निर्भयपने वागेन, जे चांगले आहे, सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही. ज्याप्रमाणे मी जगाला देईन त्याच प्रमाणे जग मला देईल यावर  मी विश्वास ठेवीन.

मद्यप्यांची मुक्तिगितं - सुरुवात कुठून करू?
मी गेले दोन महिने एएच्या सभांना येत आहे. अंतर्मनातून स्वत:चे अनुभव सांगावेत अशी इच्छा झाली. हात वर करून सभेचं संचालन करणाऱ्या सदस्याला मी खुणावलं आणि बोलायला लागलो. मी दारुडा आहे , असं सर्व जण बिनदिक्कतपणे सांगतात. मला मात्र मी अल्कोहॉलिक असल्याचं मान्य नव्हतं. ' लिव्हिंग सोबर ' हे पुस्तक वाचताना मद्यपाशी , मद्यासक्त , दारुडा किंवा अल्कोहॉलिक हे शब्द बदनामीकारक किंवा कठोर वाटले तर स्वत:लाच विचारायचं , की दारू पिणं ही माझी समस्या आहे का ? ते मान्य केल्यावरच मी एएच्या सभांना येऊ लागलो आणि गेलं दोन महिने दारूपासून दूर राहू शकलो. काल रात्री एए सभेतून घरी जाताना फेरफटका मारून जरा उशिराच घरी परतलो. माझ्या घरावरून जाणारा रस्ता एक दिशा मार्ग आहे. माझ्या मागून चुकीच्या दिशेने येणाऱ्या गाडीच्या दिव्याचा प्रकाश दिसला व नंतर भोंगाही जोरात वाजला. मागे वळून न पाहताच गाडी अडवण्याचा पवित्र्यात हात पसरून उभा राहिलो. अॅम्ब्युलन्स बघितल्यावर रस्त्याच्या कडेला उभा राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या हवालदाराप्रमाणे हात करून जाण्यास खुणावलं. ड्रायव्हरने एकंदर प्रकारावरून मी प्यालेला आहे , असा निष्कर्ष काढला असावा. त्याने वेग कमी करत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गाडी पुढे नेली. आणखी काही अंतर पुढे गेल्यावर समोरून पोलिसांची गाडी येताना दिसली. आता माझी वागणूक तशीच राहिल्यास पोलिस मला संशयावरून धरून नेतील या भीतीने मी स्वत:ला सावरून फूटपाथवर चढलो. माझी दखल न घेता ती गाडी पुढे निघून गेली. या दोन घटनांनी माझं विचारचक्र सुरू झालं. दोन महिने आपल्या शरीरात दारू नाही. परंतु आचरण दारुड्यासारखंच आहे. विचारातूनदेखील तिचं उच्चाटन झालेलं नाही.
घरी गेल्यावरही विचारचक्र सुरू राहिल्याने झोप येईना. एए सभांमध्ये बारा पायऱ्या ऐकल्या होत्या. ' अल्कोहॉलिक्स अॅनॉनिमस ' या ग्रंथामधून वाचल्या होत्या. बारा पायऱ्यांपैकी पहिली अधीर् पायरी सोडून बाकीच्या पायऱ्या बुद्धीला मान्य झाल्या होत्या. दारू जीवनात येण्यापूवीर्ही जीवन अस्ताव्यस्त होतं. व्यक्तिमत्त्वात दोष होते. कॉलेजमध्ये लेक्चर्स ऐकायला नको वाटायचं. म्हणून कॉलेजबाहेर अन्य वेगवेगळे उद्योग करत बसायचो. दिवसा झोपा काढायच्या अन् रात्री जागवायच्या. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करायला सहा वषेर् लागली. बुद्धिमत्ता बरी असूनही ती नसत्या उपद्व्यापामध्ये वापरली गेली. नेहमी चुकीच्या वागणुकीचं समर्थन करत राहिलो. घरातील माणसं , नातेवाईक , मित्र यांनी तिथे लक्ष वेधलं असता त्यांचे दोष दाखवून उलटे आरोप करून आक्रमक बनत असे. त्या व्यक्ती सावरण्याआधीच दूर होत. माझं सगळं वागणं चुकीचं होतं , असंही नाही. माझ्या दृष्टीने मी चांगल्याही गोष्टी केल्या आहेत. नशेत असतानाही मी दयाळूपणाने वागलो आहे. भिकाऱ्याने हात पसरल्यावर पन्नास रुपयांची नोट त्याला काढून दिली आहे. रस्त्यावर बसलेल्या बैलाचं डोकं , शिंगाच्या मधल्या भागात कुरवाळत बसलो आहे. भिकाऱ्यास त्या वेळेस मी वेडा वाटलो असेन. पण माझी भावना त्याला मदत करण्याचीच होती ना ? ही दया भावना व असं मुक्या जनावरावर प्रेम अन्य कोणी करतो का ? आज मला कळतंय की या अशा कृतीमधून मी श्रेष्ठ असल्याची भावना मला सुखाची वाटायची. एएमध्ये सांगितलं जातं तू वेडाही नाहीस आणि वाईटही नाहीस. या विधानाबद्दल मात्र मला आता शंका वाटू लागली आहे. माझं शहाणपण हरवलं आहे हे मला कळायला लागलं आहे. वरील बुद्धिविलासातून व आत्मसमर्थनामधून फारसे काही साधलं गेलं नाही आणि आता साऱ्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप करून फायदाही नाही. अपराधीपणाची भावना जाण्यासाठी काय करायला हवं ? क्षमा , नुकसानभरपाई ही तत्त्वं रोगट भावनांवर उपकारक ठरतील हेसुद्धा पटलेलं आहे. उरल्यासुरल्या विवेकाच्या ताकदीच्या पातळीवर उर्वरित साडेअकरा पायऱ्या मान्य झाल्याचं मी वर म्हटलं आहेच. आता प्रश्न आहे तो कृतीचा. ती कशी व कधी करायची ? सुरुवात कुठून करू ? या प्रश्नांनी माझ्या मनात गोंधळ निर्माण केला आहे. एवढं बोलून मी जागेवर येऊन बसलो. दोन सदस्य सभेनंतर मला येऊन भेटले. एक जण म्हणाला. आज जे काही बोललास ते लिहून काढ.

सुटले मद्यपाश!!
शीला के.
    जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांनी ओवलेली एक मोत्याची लांबलचक माळ. या माळेत दुःखाचे मोतीच जास्त असतात. अशीच मी एक... लग्न झाले तेव्हा मला कल्पना नव्हती की माझा नवरा मद्यपी आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता, पण मद्यपानामुळे व्यवसायाकडे त्यांचे दुर्लक्ष होत गेले व एक दिवस तो व्यवसायही बंद पडला. रोज भांडणे, मारामारी चाललेली असायची, पदरी दोन लहान मुले, मला काहीच सुचेना. कौलप्रसाद, व्रतवैकल्ये, डॉक्‍टरसुद्धा झाले, पण निकाल शून्य. मनात नाना तऱ्हेच्या विचारांनी थैमान घातले होते...
    आत्महत्या करावी असे वाटायचे. पण, निरागस मुलांकडे पाहून तोही विचार पार झटकून नाहीसा व्हायचा. क्षणात वाटायचे घटस्फोट घ्यावा असेही वाटायचे, पण त्यांच्यावर असलेले जिवापलीकडील प्रेम आणि लहानपणी झालेले चांगले संस्कार, आचार-विचार यांमुळे तोही विचार बाजूला व्हायचा. काय करावे? कुठे जावे? काहीच सुचेना. नातेवाईक व हितचिंतकांनीही यांनी दरवाजे बंद केलेले. मद्यपींच्या कुटुंबांना कुणीही जवळ करत नाही. अपमान! अपमान! आणि फक्त अपमान!     नैराश्‍याच्या गर्तेत घेरलेल्या माझ्या मनाला आशेचा किरण दिसला... एका सभासदांमार्फत "अल्कोहोलिक ऍनानिमस' या अति मद्यपींची संस्थेची माहिती मला मिळाली. माझी दोन लहान मुलं व तिसरा माझा नवरा. जो मला त्यावेळी मला लहान मुलासारखाच होता. लहान मुलासारखेच त्याला समजावून गोंजारून या संस्थेत घेऊन गेले. तो दिवस मी विसरू शकत नाही. तोच तो सोनेरी दिवस २० जुलै १९९७... त्या दिवसापासून माझा नवरा मद्यापासून दूर झाला.     जेव्हा मी "अल्कोहोलिक ऍनानिमस'मध्ये गेले, तेव्हा मला आणखी एका संस्थेची माहिती मिळाली. "ऍल-ऍनॉन' ही मद्यपींच्या परिवाराची संस्था. पत्नी, बहीण, भाऊ, आई-वडील, नातेवाईक व मित्रांची परिवाराची ही बंधुत्वावर आधारलेली संस्था. कोणतीही धर्म, जात, कात, राजकीय संस्था किंवा संघटना यांचा "ऍल-ऍनॉन'चा संबंध नाही. इथे वर्गणीही घेतली जात नाही. सभासदांनी स्वखुशीने दिलेल्या पैशांतून या संस्थेचे कार्य चालते. मद्यपींच्या परिवाराला मदत करणे हेच या संस्थेचे एकमेव ध्येय आहे.     ज्या कुणाच्या परिवारात ही समस्या आहे, त्यांनी या संस्थेचा लाभ जरूर घ्यावा. माझ्या परिवाराला जसे नवीन जीवन मिळाले आहे. तसेच ज्यांच्या परिवारात ही मद्यपींची समस्या आहे. त्यांनी याचा लाभ जरूर घ्यावा. आपले खुल्या मनाने या संस्थेत स्वागत आहे. माझ्या नवऱ्याने मद्य सोडले त्याला २० जुलै रोजी १२ वर्षे झाली. त्याचाच एक कार्यक्रम नावेली येथील कार्डिनल ग्रासियस हॉलमध्ये संध्याकाळी पार पडला. एका कृतार्थ प्रयत्नांचाच तो कार्यक्रम होता...

अ‍ॅल-अ‍ॅनॉन
तणावमुक्तीच्या वाटेवरील निरंतर प्रवास!
मद्यपाशात गुरफटलेल्या व्यक्तींना सामूहिक समुपदेशनाद्वारे व्यसनमुक्तीच्या वाटेवर आणणाऱ्या अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस (ए. ए.) या सपोर्ट ग्रुपप्रमाणेच मद्यपी कुटुंबातील महिलांना अल-अ‍ॅनॉन हा समूह मार्गदर्शन करतो. ठाण्यात तसेच कळव्यात या समूहाच्या नियमित बैठका होतात.
           
जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपाशात गुरफटते, तेव्हा त्याचे परिणाम तिला भोगावे लागतातच, शिवाय कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याचा त्रास होतो. त्यातून निर्माण होणाऱ्या ताणतणावांचा सामना करण्यात त्यांची सारी उमेद खर्ची पडत असते. विशेषत: घरातील महिलांचे आयुष्य या घालमेलीत होरपळून जाते. त्या त्रागा करतात, चिडतात. घरात रोज कडाक्याची भांडणे होतात. त्यातून मारहाणीचेही प्रकार घडतात. काहीजण यापुढे दारूला हात लावणार नाहीअशी शपथ घेऊन तात्पुरते हे वादळ आता शांत झाल्याचे भासवितात. मात्र काही काळाने पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते. काही स्त्रिया त्यातून घर सोडतात. व्यसनी पतीला घटस्फोट देतात. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, तर काही निमूटपणे चार भिंतीच्या आत सारे अन्याय, अत्याचार सहन करीत राहतात.
अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस (एए) हा जगभर कार्यरत असणारा सपोर्ट ग्रुप जसा मद्यपाशातून बाहेर येण्यास व्यक्तीला मदत करतो, त्याचप्रमाणे अ‍ॅल-अ‍ॅनॉन समूह व्यसनी व्यक्तीच्या सहवासातील महिलांना मार्गदर्शन करतो.
   
ही इज नॉट बॅड, नॉट मॅड बट ही इज ए सीक पर्सन या वास्तवाची हा समूह अशा दुर्दैवी महिलांना जाणीव करून देतो. इथे आल्यानंतर असा त्रास भोगणारे आपण एकटे नाही, आपल्यासारख्या अनेकांच्या वाटय़ाला हा त्रास आलेला आहे. तो काही प्रमाणात गृहित धरूनच किंवा त्याकडे दुर्लक्ष करूनच आपल्याला आपले आयुष्य जगायचे आहे, याचे भान हा सपोर्ट ग्रुप महिलांना देतो. ए. ए. मध्ये येणारे एकेका दिवसाने दारूपासून दूर राहण्यास शिकतात, तसेच अ‍ॅल-अ‍ॅनॉनची सदस्या इथल्या शेअरिंगमुळे अधिक प्रगल्भ होते. काही वेळा तिच्या इथे येण्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडत नसला तरी त्याला सामोरे जाण्यास ती शिकते. उदाहरणार्थ सुधा. गेली २६ वर्षे. तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे. त्यातली जवळजवळ २४ वर्षे तिने एकटीने त्यातून उद्भविणारा त्रास सहन केला. आता मुलं मोठी झाली. कमवू लागली. त्यांनी तिला वडिलांपासून वेगळा होण्याचा सल्ला दिला. त्याचदरम्यान तिला अल-अ‍ॅनॉनचा संदेश मिळाला. ती नियमित बैठकांना येऊ लागली. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही, त्याकडे दुर्लक्ष करण्यास ती शिकली. तिचे पती ए. ए.मध्ये येण्यास तयार नाहीत. प्रत्येक मद्यपीला आपण लिमिटमध्ये पितो असेच वाटत असते. त्यामुळे सर्वनाशाच्या टोकावर उभे असूनही सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासही ते तयार नसतात. अशांना त्यांच्या त्या अवस्थेत सोडून देणेच अनेकदा श्रेयकर ठरते. मात्र हे झाले अपवादात्मक. पती ए. ए.मध्ये आणि पत्नी अल-अ‍ॅनॉनमध्ये असेच सर्वसाधारण चित्र दिसते. सुरुवातीला महिलांना वाटते- मी कशाला जाऊ? व्यसन हा काही माझा प्रॉब्लेम थोडाच आहे, पण व्यसन हे विसंवादाचे एकमेव कारण नसते. इथे आल्यावर महिलांना त्याची जाणीव होते. दुसऱ्याचे सगळे चूक, आपले तेवढेच बरोबरहा स्वार्थमूलक विचार हळूहळू बदलतो. स्वत:तले दोष दिसू लागतात. त्यामुळे व्यसनमुक्तीनंतरचे सहजीवन अधिक समृद्ध होत जाते.
प्रीती ही दुसरी एक अल-अ‍ॅनॉन सदस्या. तिचा प्रेमविवाह. लग्नाआधीच पतीच्या व्यसनाबद्दल तिला कल्पना होती. सगळेच थोडीफार दारू पितात. लग्नानंतर आपण त्याची दारू बंद करू, हा तिच्या ठायी असलेला आत्मविश्वास काही दिवसातच कोलमडला. ती भांडली. घटस्फोटाची, आत्महत्येची धमकी दिली. डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ झाले. मात्र काहीच फरक पडला नाही. अखेर एका मानसोपचारतज्ज्ञानेच एएविषयी सांगितले. तिथेच अल-अ‍ॅनॉनविषयी समजले. आता हे दाम्पत्य इतरांना धीर देते. प्रीती अल-अ‍ॅनॉनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आहे. देशभरात ठिकठिकाणी या संदर्भात ती महिलांना मार्गदर्शन करीत असते.वृंदाचे पती ए.ए.मध्ये येऊन सोबर झाले. सुरुवातीच्या काळात ती अल-अ‍ॅनॉनमध्ये येत नव्हती. मात्र नंतर नियमित येऊ लागली. परमेश्वराची कृपा झाल्यानेच मला हा मार्ग दिसला, अशा शब्दात ती आपल्या भावना व्यक्त करते. पास्ट इज हिस्ट्री, फ्यूचर इज मिस्ट्री, टुडे इज रिअ‍ॅलिटीही वस्तुस्थिती इथे आल्यावर आपण स्वीकारली असे ती म्हणते.
देशभरात एएचे सुमारे ८०० ग्रुपस् आहेत. अल-अ‍ॅनॉन समूह त्यामानाने खूपच कमी म्हणजे शंभर आहेत. मुंबईत ४०० एए समूह असून ३३ अल-अ‍ॅनॉन आहेत. ठाण्यात २९ वर्षांंपूर्वी १९८० मध्ये १४ फेब्रुवारी रोजी अल-अ‍ॅनॉन समूहाची स्थापना झाली. १४ फेब्रुवारीमुळे या समूहाचे नाव ठेवण्यात आले, व्हॅलेंटाईन अल-अ‍ॅनॉन. त्यानंतर कळव्यात सेकंड इनिंग नावाने दुसरा ग्रुप कार्यरत झाला. ठाण्यात होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, के व्हिला येथे दर मंगळवार- गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता या समूहाच्या बैठका होतात. सेकंड इनिंगच्या बैठका दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता कळवा म्युनिसिपल स्कूल, प्रभात आईस्क्रिमसमोर, कळवा येथे होतात. प्रवेश अर्थातच विनामूल्य असतो. इथे कोणताही धार्मिक- सांप्रदायिक उपदेश केला जात नाही. कोणत्याही परिस्थितीत समूहातील सभासदांची ओळख जाहीररीत्या प्रदर्शित केली जात नाही. गेल्या २९ वर्षांंत शेकडो महिलांनी या बैठकांमध्ये शेअरिंग केले. सन्मार्गाकडे नेणारा हा प्रवास खरेतर निरंतर असतो. रक्तदाब अथवा मधुमेहाच्या आजारात जशी कायम औषधे घ्यावी लागतात
, तसाच काहीसा हा प्रकार असतो. (लेखातील नावे काल्पनिक आहेत.) अल-अ‍ॅनॉन हेल्पलाइन- ९३२१२७११२२
प्रशांत मोरे
लोकसत्ता रविवार , ८ फेब्रुवारी २००९



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: